कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या माजी आमदार सोनाली गुहा यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार आगपाखड करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, पण आता त्यांनी पुन्हा माफी मागत ममतांच्या नेतृत्वाचा गौरव केला आहे आणि पक्षात पुन्हा प्रवेश देण्याची गळ त्यांनी ममतांना घातली आहे.
मी भावनिक झाले होते, पण ती माझी चूकच होती. ती चूक मला उमगली आहे. मी ममतांशिवाय जगू शकत नाही, असे निवेदन करीत त्यांनी पुन्हा तृणमूल कॉंग्रेस पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिदींनी मला माफ करावे, त्यांनी मला माफ केले नाही तर मी जगू शकणार नाही, असेही त्यांनी ममतांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सोनाली गुहा या तृणमूलच्या तब्बल चार वेळा आमदार झाल्या आहेत. ममतांच्या उत्तराधिकारी म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती. पण त्यांनीही अन्य नेत्यांप्रमाणेच तिकीट नाकारल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने माझा केवळ वापर करून घेतला. त्यांनी मला ममतांच्या विरोधात सतत गरळ ओकण्यास सांगितले होते.
पण मी ते केले नाही त्यामुळे त्यांनी मला बाजूला सारले. आता मी त्यांना न सांगताच पुन्हा तृणमूलमध्ये परतणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोनाली गुहा या पश्चिम बंगाल विधानसभेच्या माजी उपाध्यक्षाही आहेत.