देशातील नऊ महानगरात आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत सहा टक्के वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत 61,789 घरांची विक्री झाली तर गेल्यावर्षी याच काळात घराच्या विक्रीचा आकडा हा 58,292 एवढा होता. प्रमुख नऊ शहरात गुरुग्राम, नोइडा, मुंबई, कोलकता, पुणे, हैदराबाद, बंगळूर, ठाणे आणि चेन्नइचा समावेश आहे.
अहवालानुसार 2018 नंतर सुरू झालेल्या योजनांत काही विकासकांनी घरांच्या किमती कमी करण्यासाठी घराचा आकार कमी केला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. विकासकांनी घरविक्रीसाठी केलेल्या उपायाचा फायदा झाला. त्यामुळे नामांकित विकासकांना निवासी प्रकल्पांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात एप्रिल ते जून या तिमाहीत नवीन सुरू झालेल्या योजनांत घराची उपलब्धता ही 11 टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे.