मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे.
शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसत आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,’यंत्रणेचा तपास सुरु आहे. या प्रकरणाबाबत मी जास्त बोलणं उचित नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे.” असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते . शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली.
१६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.