सातारा – कोरोना आजाराने हाहाकार माजविला असल्याने गंभीर आणि अडचणीच्या काळाचा सामना करण्याकरीता व नागरिकांना कोरोना आजारापासून दुर ठेवणेकरीता देशातील, राज्यातील,शहरातील आणि गावागांवातील पोलीस यंत्रणा ही आपला जीव मुठीत धरुन रस्त्यावर उभा राहून काम करीत आहेत.
ही यंत्रणा रस्त्यावर कार्यरत आहे म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत या जाणिवेतून राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आज राज्यातील पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करुन त्यांच्या सुरक्षेकरीता असणारा सर्व फौजफाटा बाजूला ठेवून सातारा शहरात दुचाकीवरुन फेरफटका मारला.
सातारा शहरातील संचारबंदीची ठिकठिकाणी पहाणी केली . यावेळी त्यांनी पोलीसांच्या आरोग्याची चौकशी करीत त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीसांना त्यांनी कडक शब्दात समजही दिली.