मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून एकच वादळ उठले होते. एवढेच नाही तर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही राजकारण्यांकडून करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर आजपर्यंत कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. याच मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयला सवाल केला आहे.
It has been more than 5 months since the investigation began but CBI has not revealed if actor Sushant Singh Rajput was murdered or he died by suicide. I request CBI to reveal findings of the investigation at the earliest: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/BMGgLdaoyg
— ANI (@ANI) December 27, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचेही म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र,अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.
सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.