मार्क्सवादी पॉलिटब्युरोचा आरोप
नवी दिल्ली – गृहमंत्री अमित शहा यांनी काही पूरग्रस्त भागाची हवाई पहाणी केलीे; पण त्यांनी ही पहाणी केवळ भाजप शासित राज्यांमध्येच केली, त्यांनी केरळला मात्र जाणिवपुर्वक टाळले असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की अमित शहा यांनी केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्याच पूरस्थितीचा पहाणीचा दौरा आखला. पण ज्या केरळला पावसाने आणि पुराने तुफानी तडाखा दिला आहे तिकडे ढुंकुनही पहायला त्यांना वेळ मिळाला नाही हे निंदनीय आहे.
पॉलिट ब्युरोने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की संघ आणि भाजप परिवारातील लोकांनी सोशल मिडीयावर मोहीम चालवून केरळातील पूरग्रस्तांना मदत करू नका असे खोडसाळ आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीसारख्या स्थितीत तरी या लोकांनी राजकारण बाजूला ठेऊन काम करायला हवे होते असेही या पक्षाने नमूद केले आहे.
देशात उद्भवलेल्या पूरस्थितीचा सर्वात मोठा फटका केरळला बसला असून तेथे आत्तापर्यंत 76 जण दगावले आहेत तर 58 जण बेपत्ता आहेत. राज्यातील 2 लाख 87 हजार 585 लोक विस्थापित झाले असून त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 1654 मदत छावण्या उभारल्या आहेत.