मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना पुन्हा एकदा भोंग्यासंबंधी दिलेल्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला. ईदनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान या भाषणानंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सभेनंतर आज सूचक वक्तव्य केले आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी “राज ठाकरेंच्या भाषणात फक्त भोंगे, शरद पवारांवरील टीका आणि त्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्यं मला पहायला मिळाली,” अशी टीका केली आहे.
तसेच “सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकर लावायचे असतील त्यांनी रात्री १० ते सकाळी ६ ही वेळ सोडून इतर वेळी पोलिसांची परवानगी घेऊन लावायचे आहेत असं सांगितलं आहे. आता राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा वेगळा आदेश देण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी सुनावले.
राज ठाकरेंनी ईदनंतर मशिदींसमोर हनुमान चालीसा विचारलं असता गृहमंत्री म्हणाले, “आम्ही यासंदर्भात उद्या मुंबईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न आहे. अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल”. राज ठाकरेंच्या भाषणात काही आक्षेपार्ह होतं का यासंबंधी औरंगाबादचे पोलीस आयुक्त अभ्यास करत असून कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगत त्यांनी सांगितले.