जवानांच्या वारसदाराला मिळणार सरकारी नोकरी
मुंबई – 1 मे अर्थात महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात चुकीचे निर्णय घेत ओपन जीपमध्ये सर्व जवानांना घटनास्थळी पाठविल्याचा ठपका ठेवत पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली. तसेच शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच सदनिका देणार असल्याचे जाहीर करतानाच शहिदांच्या वारसाला सरकारी नोकरी दिली जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
गडचिरोलीत 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात 15 पोलिसांना वीरमरण आले होते. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. केसरकर म्हणाले, कुरखेडा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यात येईल. जवानांच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून प्रति व्यक्ती 25 लाख याप्रमाणे 3 कोटी 75 लाख रुपये व सदनिकेची किंमत प्रति व्यक्ती 22 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे 3 कोटी 37 लाख 50 हजार रुपये असे एकूण 7 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.
केंद्रीय सुरक्षा निधीमधून प्रत्येक वारसाला 20 लाख रुपये असे एकूण 3 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रुपये 20 लाख 50 हजार प्रमाणे एकूण 3 कोटी 7 लाख 50 हजार मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून काढण्यात आलेल्या विम्याची रक्कम 10 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 50 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडून सानुग्रहाची रक्कम प्रत्येकी 50 हजार रुपये व विशेष बाब म्हणून 50 हजार व पोलीस कल्याण निधी अंत्यविधीकरिता 12 हजार रुपये शहीद कुटुंबियांच्या वारसांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.