द्धव ठाकरे ः घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक
मुंबई : लॉकडाउनमुळे राज्यातील जनतेची गैरसोय होत असली तरी हे सगळे आपल्यासाठीच सुरू आहे. करोनाबधितांचा आकडा वाढत असला तरी हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. पण लॉकडाउनच्या काळात लोकांनी घरातच राहून सहकार्य करावे. हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड-किल्ले आहेत असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आवश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडणारच असाल तर पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत.
त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशलमिडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सद्य स्थितीची माहिती लोकांना दिली. लॉकडाउनच्या काळात लोकांनी घरातच राहून सहकार्य करावे. पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत.
वापरलेले मास्क कचछयात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. पीपीई किट, एन 95 मास्क आदींचा तुटवडा तर जगभरातच जाणवतो आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरात मध्ये व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीट सारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत. सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
करोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य सेवेची चार भागात विभागणी केली आहे. राज्यात फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.
ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत त्यांनी या क्लिनिक मध्येच जायचे आहे. त्यानंतर कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील, मध्यम स्वरुपाची, तसेच कोरोना शिवाय इतर ही रोग असतील अशी तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर तैनात असतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्रधर्माचे पालन !
शिवभोजन थाळीची क्षमता सध्या 1 लाखापर्यंत वाढविण्यास परवानगी दिली आहे. आवश्यकता लागली तर त्यातही वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. जात, धर्म, पंथ, परराज्यातील मजूर असा कोणताही भेदभाव न करता निवाराकेंद्रांत 6 लाख लोकांना दररोज सकाळच्या नाश्त्यासह दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे.राज्य सरकार महाराष्ट्रधर्माचे पालन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.