मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या ‘तडीपार मोर्चा’त सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी,“गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा मागितली नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं”, असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी दिली.