शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे घराचे नियोजन करताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची आज गरज आहे. आज अनेक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. कुटुंब एकत्र पद्धतीचे असो की, दोघांचेच असो, घराच्या आकारानुसार घराची सजावट करता येणे शक्य आहे. त्यानुसारच प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि गरजांचा विचार होणे अनिवार्य आहे.
कुटुंब पद्धतीनुसार घराची सजावट (भाग-१)
विभक्त कुटुंब : अलीकडे नोकरी व्यवसायामुळे शहरात आलेल्या बहुतेकांचे चौकोनी कुटुंब आहे. घरात सदस्य संख्या कमी असतात तसेच वयातही तफावत असते. त्यामुळे अंतर्गत सजावट करताना घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपली गैरसोय होणार नाही या पद्धतीने डिझाइन करायला हवे. कौटुंबिक पद्धतीतील बदल लक्षात घेऊनच सजावट करण्याची गरज आहे.
असे करा इंटेरिअर
विभक्त कुटुंब असल्याने वैचारिक स्वातंत्र्य असते. त्यामुळे नवीन वस्तूंची आवक-जावक चालू राहते, त्यासाठी जागा निर्माण करून ठेवली पाहिजे.
घर म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब असते व त्याला एक व्यक्तिमत्त्व मिळेल, अशा प्रकारचे डिझाइन व रचना असली पाहिजे. शहरवासीयांबरोबर ग्रामीण भागातसुद्धा जीवनमानाची पद्धती बदलली आहे. वाढत्या महागाईमुळे प्रत्येकालाच हा विषय महत्त्वाचा वाटू लागला आहे. अखेर कोणतीही वस्तू किंवा सजावट ही “व्हॅल्यू फॉर मनी’ स्वरूपाची असावी. सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पाहून कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हे ठरविले पाहिजे. वाजवीपेक्षा कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व दिले नाही, तर नक्कीच घराची सजावट करता येईल.
प्रत्येकजण आपल्या वास्तूची सजावट काहीशी वेगळी करण्याचा प्रयत्न करीत असतो. बाजारामध्ये सजावटीसाठी भरमसाठ प्रकार उपलब्ध झाले आहेत. तरीही इंटेरिअर करताना जीवन पद्धतीचा सारासार विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. लाईफस्टाईल ही कुटुंबातील प्रत्येकाला साजेशी अशीच असली पाहीजे.