रावणगाव – सध्या राज्यात सर्वत्र मतदार पडताळणी कार्यक्रम (ईव्हीपी) कार्यक्रम सुरू आहे. हे काम प्रत्येक गावातील बीएलओ करीत असतात; परंतु बरेच मतदार ही दुरुस्ती करण्याबाबत उदासीनता दाखवतात, त्यासाठी व्होटर हेल्पलाइन ऍप निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले आहे आणि या ऍपद्वारे मतदारांना घरबसल्या नवीन मतदार नोंदणी करणे, यादीतील चुका दुरुस्त करणे, पत्ता बदलणे, आदी कामे करता येणार आहे.
प्रत्येक मतदारसंघातील बीएलओंना हे काम दिलेले असून, मतदार यादी अद्ययावत करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. यात मतदाराचे नाव, वय, पत्ता यामध्ये आवश्यक दुरुस्ती करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, अंध-अपंग मतदारांची यादी करणे, मतदारांचे मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक जोडणे आदी कामे येतात.
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या मतदारांची नोंदणी झाली नाही अशा 18 वर्ष पूर्ण असलेल्या वंचित नागरिकांना नाव नोंदणीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.