मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होताच नाले तुंबल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहेत. या मुद्द्यावरून आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यासाठी नितेश राणेंनी एक ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली, असा गंभीर आरोप केला आहे.
शेअर केलेल्या ट्वीटमध्ये नितेश राणे यांनी, “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेनं ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे.” असे म्हटले आहे. यासोबत नितेश राणे यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेली विधाने कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना त्रास होत असलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे.
देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईची मात्र आदित्यसेनेनं ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे. pic.twitter.com/uH9qSe0GCt
— nitesh rane (@NiteshNRane) July 10, 2022
व्हिडीओच्या माध्यमातून देखील त्यांनी आदित्य ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे. “पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारी वीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली.” अशी वाक्य वापरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.