नगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून, वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत वीज बिलांची होळी केली.
यावेळी भाकपचे राज्य सहसचिव ऍड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे जिल्हा सचिव ऍड. सुधीर टोकेकर, शंकर न्यालपेल्ली, भैरवनाथ वाकळे, दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, संतोष गायकवाड, विजय केदारे, अंबादास दौंड, चंद्रकांत माळी, रवींद्र वाबळे, महादेव कोलते उपस्थित होते.
महावितरणने लॉकडाऊन काळातील रीडिंग न घेता तीन महिन्याचे सरसकट सरासरी वाढीव रकमेची वीज बिले नागरिकांना पाठवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक करोनाच्या संकटकाळात हवालदिल झाले असून, वीज बिलामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
करोना सारख्या महामारीच्या संकटात नागरिक होरपळले जात असताना महावितरण कडून ग्राहकांची पिळवणूक सुरु असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.