पुणे – जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील पावसाचा जोर शनिवारी काहीसा कमी झाल्याने धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. सध्या मुळशी धरणातून सर्वाधिक म्हणजे 15 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरल्यामुळे आता पाणलोट क्षेत्रात थोडा जरी पावसाचा जोर वाढला, तरी लगेच पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून शुक्रवारी 19 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर शनिवारी सकाळपर्यंत हे प्रमाण कायम होते.
दुपारी मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातील विसर्ग 13 हजार 981 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला, तर वरसगाव धरणातून 4 हजार 440 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणातील विसर्ग 8 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. पानशेत धरणातून 2 हजार 931 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या धरणातून शुक्रवारी 4 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. पवना धरणातून 5,726, तर मुळशी धरणातून 15,400, वीर धरणातून 13,961 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. हे सर्व पाणी हे उजनीमध्ये जमा होत असल्यान तेथून 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.