शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचाराचा करणार निषेध
नगर – जनादेशाचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने दि. 25 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिली.
मुंडे म्हणाले की, भाजपचा विश्वासघात करुन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला. सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू, अशी घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.
शेतकऱ्यांची सरसकट फसवणुक केली आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे 43 लाख खातेदारांना 19 हजार कोटीचा लाभ दिला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होण्याऱ्या खरेदीचे प्रमाण खुप कमी झाले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करण्याऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील घटना, ऍसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार अशा घटना वाढू लागल्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, माजीमंत्री शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, आ. मोनिका राजळे, आ .बबनराव पाचपुते, प्रा. भानुदास बेरड, चंद्रशेखर कदम सहभागी होणार आहेत.