लंडन – नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ गट पुरुषांच्या जागतिक हॉकी स्पर्धेतून इंग्लंडने माघार घेतली आहे. भारतातील करोनाबाबतच्या कठोर नियमांमुळेच इंग्लंडने माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार सर्व विदेशी खेळाडूंना भारतात दाखल झाल्यानंतर 10 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
येत्या 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या जागतिक हॉकी
स्पर्धेतून दुर्दैवाने माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल आम्ही जागतिक हॉकी महासंघाला कळविले आहे, असे इंग्लंड हॉकी मंडळाने म्हटले आहे. करोनाबाधितांची चिंताजनक संख्या तसेच खेळाडू व कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता आमच्या संघाला स्पर्धेत सहभागी होणे अशक्य झाले आहे.
भारत सरकारने खेळाडू व कर्मचाऱ्यांसाठी दहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याने इंग्लंडमधून येणारे सर्व ब्रिटिश नागरिक त्यांची लसीकरणाची स्थिती कशीही असो त्यांना प्रवासापूर्वी 72 तासांच्या आत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही भारतात दाखवावा लागणार आहे.