हॉकीपटू मनप्रीत व राणी रामपालला विश्वास
नवी दिल्ली – भारताचे पुरुष व महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून गतवैभव प्राप्त करतील, असा विश्वास कर्णधार मनप्रितसिंग व राणी रामपाल यांनी व्यक्त केला.
1980 सालापासून भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेले नाही. तर महिला संघही या स्पर्धेत यंदा पात्र ठरला असला तरीही यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये महिला संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. यंदा मात्र, दोन्ही संघ सातत्याने सरस कामगिरी करत आहेत. मार्चपासून करोनाचा धोका वाढल्याने सर्व स्पर्धा रद्द झाल्या. पण त्यापूर्वी गेल्या दोन मोसमांमध्ये दोन्ही संघांनी सरस कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघात अनुभवी व नवोदित खेळाडू असून त्यामुळेच संघांचा समतोल साधला गेला आहे. आता गेल्या दोन मोसमांतील स्पर्धांमध्ये झालेल्या कामगिरीचा विचार करता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची नामी संधी दोन्ही संघांना आहे, असे मत मनप्रीतने व्यक्त केले.
महिला संघ ऑलिम्पिकला पात्र ठरला त्यावेळी खूप आनंद झाला होता. त्यानंतर यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संमिश्र कामगिरी झाली आहे. ज्या स्पर्धांमध्ये पराभव झाले त्याचे रेकॉर्डिंग पाहून खेळाडूंना आपल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. आता लवकरच सरावसत्र सुरू होत असून त्यातूनच खेळाडू पुढील स्पर्धांसाठी तसेच ऑलिम्पिकसाठी सज्ज होती, असा विश्वास राणी रामपालने व्यक्त केला.