नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही ठिकाणचे निर्बंध प्रशासनाकडून काढून घेण्यात येत आहेत. त्यातच आता दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना धमकी दिली आहे. घराच्या बाहेर कोणीही निघू नये अशा प्रकारच्या धमक्या हिजबुल मुजाहिद्दनच्या दहशतवाद्यांनी दिल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत असतानाच हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी संघटनेने धमकीचे शस्त्र बाहेर काढले आहे. संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकाव्दारे दहशतवाद्यांनी नागरिकांना घराबाहेर न निघण्यास सांगितले आहे. तर जे टॅक्सी चालक आहेत त्यांना टॅक्सी न चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत तर राज्यातील दुकानदारांनी कुठलीही दुकाने न उघडण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांनी शाळांना देखील टार्गेट केले असून रस्त्यावर शाळेत जाणाऱ्या मुली दिसल्या तर त्यांना धोक्याचा सामना करावा लागणार असल्याचे पत्रकाव्दारे सांगण्यात आले आहे.