देशात कोरोना विषाणुची दुसरी लाट ओसरत असली तरी यापूर्वीच गंभीर आजारांशी सामना करणाऱ्यांसाठी हा विषाणू अधिक धोकादायक ठरत आहे. यातच वाराणसीतील बनारसमध्ये चक्क १० HIV पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती.
परंतु या रुग्णांनी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाविरोधी लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. त्यामुळे गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनासाठी ही बातमी दिलासाजनक आहे.
एआरटी सेंटरमध्ये उपचार घेणारे हे रुग्ण उत्कृष्ट समुपदेशन आणि सेंटरमधील आरोग्य यंत्रणेच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोरोना विषाणूला पराभूत करु शकले. टीबी आणि एचआयव्ही सारख्या रूग्णांसाठी कोरोना संसर्ग सर्वाधिक घातक ठरत आहे. कारण या रोगांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आधीच खूप कमकूवत झालेली असते.
यात जर कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णाचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु असे असतानाही या १० रूग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीरित्या जिंकली. यावरून हे सिद्ध झाले आहे की, कोरोनाबाधित रुग्णाने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे योग्य प्रकारे घेतली तर त्यांच्यावर कोणताही विषाणू प्रभावी ठरू शकणार नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान एकाही एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णास कोरोना संसर्ग झाला नव्हता. डॉ. प्रिती अग्रवाल सांगतात, बनारस जिल्ह्यात सुमारे ४५०० HIV रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परंतु यातील १० रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. एचआयव्ही रूग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे.
एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कोरोना संसर्गापूर्वीच कमकुवत झालेली असते. यात कोरोनाबाधित रूग्णाला अँटीव्हायरल औषध दिले जात आहे. परंतु एचआयव्ही रुग्णांना अँटीव्हायरल औषध आधीपासूनच दिली जात आहे, म्हणून HIV पॉझिटिव्ह रुग्णावर कोरोनाचा संसर्ग धोका इतरांपेक्षा कमी होत आहे.
जर एखादा एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांदरम्यान नियमितपणे कोणतेही अंतर न देता औषधे घेत असेल तर त्यांच्या आयुष्याला कोणताही धोका निर्माण होऊ शकत नाही. दरम्यान या केंद्रात आता एचआयव्ही संसर्ग झालेल्या सर्व रूग्णांना तपासणीसाठी बोलावले जाणार असून रुग्णांना औषधे देण्याबरोबरच कोरोना रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी उपाययोजनाही केल्या जात आहेत.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, काही महिन्यांपूर्वीच सरकारने एचआयव्ही रूग्णासाठी सर्वात महागडे औषध बाजारात आणले आहे. हे औषध पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. दरमहा रूग्णाला 30 हजार किंमतीची औषधे मोफत दिली जात आहेत. हे औषध त्यांच्या प्रतिकारशक्तीचा आधार आहे.