नागपूर : नागरिकांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आणि लढाई केली तर, दिल्ली सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार त्यांना मारेल, असा संदेश या सरकारने दिला आहे. पण काँग्रेस कदापी या सरकारची ही हिटलरशाही महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारला दिला आहे.
नागपुरात नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत फडणवीस सरकारवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे काम सुरू झाले. त्यादरम्यान, परभणीत दलितांवर जनावरांपेक्षा जास्त लाठीचार्ज केला. लोखंडी सळ्यांनी लोकांना मारले, तर हा पाशवी बहुमताचा असर आहे का, असा सवाल त्यांनी केला.
महायुतीला लोकांची गरज नाही. आम्ही मशीनद्वारे जिंकू शकतो. लोकांना बेदम मारहाण करायची. कुठलीही काळजी करायची नाही. मनुष्य जानवरासारखा आहे, या परभणीत घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची आणि त्यांच्या हातात असलेल्या संविधानाची ज्याप्रकारे विटंबना झाली, त्याचा आम्ही निषेध केला. तसेच, या घटनेची शासनाने दखल घ्यावी असे आम्ही शासनाला सांगूनही हे शासन फक्त मलाई खाण्यात व्यस्त आहे असे नाना पटोले यांनी म्हटले.
परभणी प्रकरण पाहिल्यास या सरकारची मानसिकता लक्षात येते. त्यानुसार दिल्लीत नागरिकांनी त्यांच्या हक्काची लढाई केली तर दिल्ली सरकार त्यांना मारते. तसेच, महाराष्ट्रात लोकांनी त्यांचा हक्कासाठी आवाज उठवला तर त्यांना आम्ही मारणार, असा संदेश या सरकारने दिला आहे. पण काँग्रेस महाराष्ट्रात हे कदापी चालू देणार नाही. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात या सरकारची ही बेबनशाही आणि हिटलरशाही काँग्रेस चालू देणार नाही’, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.