औरंगाबाद – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात सध्या देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
औरंगाबाद येथील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये मोर्चात जितेंन्द्र आव्हाड म्हणाले,’मुस्लीम समाजाचं नाव पुढे करून हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरू असलेली ही मोठी लढाई आहे. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे जुने पुरावे कोठून येणार.’ असा सवाल आव्हाड यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या रूपात हिटलरचा पुनर्जन्म झाला असून लवकरच सोशल मीडियासाठीही कायदा लादला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.