नगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये करोना विषाणूच्या प्रदुर्भवाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून महापालिकेच्या पथकाने गेल्या तीन दिवसात ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणलेली असली तरी काही बंधने प्रशासनाकडून घालण्यात आलेली आहेत. त्यामध्ये घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, शहरातील बाजार पेठेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच खुले ठेवणे हे बंधनकारक केलेले आहे. या नियमांचे पालन केले जाते किंवा नाही या साठी महापालिकेने प्रभाग समितीनिहाय गस्ती पथके तैनात केलेली आहेत. या पथकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून गेल्या तीन-चार दिवसांत शहरात 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रभाग समिती क्रमांक एकच्या हद्दीत सामाजिक अंतर न ठेवणे, मास्क न लावणे, वेळेचे बंधन न पाळणे यासाठी नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून 12 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई स्वच्छता निरीक्षण अविनाश हंस, बाळासाहेब पवार, राहुल साबळे, राजेश आनंद, रवी सोनवणे यांनी केली. तर कापड बाजार येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 13 हजार रुपये दंड प्रभाग समिती क्रमांक दोनच्या पथकाकडून वसूल करण्यात आला. तसेच प्रभाग समिती क्रमांक दोन च्या हद्दीमध्ये मास्क न लावणारे, सुरक्षित अंतर न ठेवणारे व वेळेचे बंधन न पाळणारे यांच्याकडून एकूण 17 हजार रुपये दंड वसूल करण्यातआला.