महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे
100 वीजखांब, एक रोहित्र उभारण्याचे काम पूर्ण
पुणे – ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर अन् समुद्रसपाटीपासून सुमारे 4 हजार 750 फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर, जि. पुणे) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे आहे. या गावांमध्ये सुमारे 100 वीजखांब व एक रोहित्र उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या गावांचा वीजपुरवठा सुरू होणार आहे.
अतिदुर्गम व सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत अन् घनदाट जंगल तसेच वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसलेल्या जिल्ह्यातील माळवाडी व धानवली गावांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. डोंगरदऱ्या व कातळ कडा चढत वीजखांब व इतर विद्युत साहित्य अक्षरशः खांद्यावर वाहून नेण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत अतिदुर्गम रायरेश्वर पठारावरील मतदान केंद्रामुळे माळवाडी व धानवली गावे नुकतीच चर्चेत आली होती. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या गावांच्या विद्युतीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या वीजयंत्रणेचा आढावा घेतला व ही दोन्ही गावे लवकरच प्रकाशमान होतील असा विश्वास व्यक्त केला.
भोरपासून सुमारे 40 किलो मीटर अंतरावर असलेल्या या दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. खोल दऱ्या, दाट झाडी, उंच सुळके व आडवळणीचा घाट अशा अत्यंत दुर्गम व 11 किलो मीटर अखंड असलेल्या रायरेश्वर पठारावर रायरी ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी हे 10 घरांचे गाव वसलेले आहे. त्यापुढे अडीच किलो मीटरवर धानवली हे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे 35 घरांचे गाव आहे. रायरेश्वर पठारावरील माळवाडी येथे जाण्यासाठी 300 फूट उंचीचा कातळ कडा लोखंडी शिडीच्या सहाय्याने चढावा लागतो तर तेथून धानवली गावात जाण्यासाठी 235 फुटाचा कातळ कडा उतरावा लागतो. ही वीजयंत्रणा पूर्ण झाल्यानंतर माळवडी व धानवली येथील 45 घरांना नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे.
माळवाडी व धानवली गावांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीने 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रायरेश्वर मंदिरापासून 50 वीजखांबांद्वारे सुमारे 3.5 किलो मीटर उच्चदाब वीजवाहिनीचे काम सुरू आहे. माळवाडी येथे 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येत आहे. माळवाडी येथून पुढे आणखी 50 वीजखांब उभे करून दोन किलो मीटरवर असलेल्या धानवली या गावाला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही गावांच्या विद्युतीकरणासाठी 100 वीजखांब, एक रोहित्र, 21 किलो मीटर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या व इतर साहित्य हे 11 किलो मीटरच्या पायरस्त्याने व डोंगरदऱ्यातून नेण्यात येत आहे.