सातारा – साताऱ्याच्या ऐतिहासिक राजवाडा परिसरातील गोलबागेला विक्रेत्यांचा विळखा पडल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. शहर विकास विभागाने डोळे झाकल्याने कोणीही यावे आणि गोलबागेजवळ पथारी मांडावी, अशी अवस्था आहे. ना नगराध्यक्ष, ना मुख्याधिकारी कोणालाच शहराच्या सौंदर्याचं आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाचे देणे घेणे नसल्याने नियोजनाचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे.
शहरातील सर्वात जुने असे 19 व्या शतकात बांधलेल्या गोल बागेकडे दुर्लक्ष आहे. बागेत सायंकाळी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत. यामुळे महिलांसह ज्येष्ठांची गैरसोय होत आहे. शहरातील इतर बागाच्या सुशोभिकरणाकडे नगरपालिका विशेष लक्ष देत आहेत. मात्र, ऐतिहासिक गोल बागेकडे मात्र पाठ फिरवली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शहरात विविध पेठा ही वसविण्यात आल्या.
नागरिकांसाठी पाण्याची सोय म्हणून ठिकठिकाणी हौदांची निमिर्ती केली, तर राजवाडा येथील गोल बागेची निर्मिती याच काळात झाली आहे. शहरातील ऐतिहासिक बाग म्हणून या बागेची विशेष ओळख आहे. शहरातून तसेच आसपासच्या गावातूनही बाग बघण्यासाठी लोक मोठया संख्येने येत असतात. लहान मुले, महिला ज्येष्ठ मंडळी यांची सायंकाळच्या वेळी गर्दी झालेली असते. बागेत बसण्यासाठी मोजके बेंचेस अपुरे पडत असल्याने बालगोपालांसह सर्वांना परिसरातील संरक्षण भिंतीवर बसावे लागत आहे.
उन्हाळयातील सुट्टया, दिवाळी सुट्टयांमध्ये ही बाग गजबजलेली असते. गर्दीने ही बाग फुलुन जात आहेत. शहरातील इतर भागात असणाऱ्या बागांचे नुतनीकरणाचे काम करण्यात आले. तर सदर बझार परिसरात नवीन बाग उभारण्यात आली. यावर हजारो रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, नगरपालिकेने ऐतिहासिक बागेकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही कोणत्याच सोयी पुरवण्यात येत नाहीत. बागेला बेंचेस पुरवण्याची व बसवण्याची वर्क ऑर्डर देऊनही प्रशासनाकडून प्रतिसाद नसल्यामुळे काम करणाऱ्या ठेकेदाराची अडचण झाली आहे.
चौपाटीचे सांडपाणी बागेच्या वळचणीला
गांधी मैदानावरील चायनीज पदार्थांचे खरकटे व पाणी गोलबागेजवळच्या गटारात ओतले जाते. मात्र, बऱ्याच वेळा गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या सांडपाण्याची दुर्गंधी येत असते.गोल बागेचा बाहेरील कट्टा म्हणजे विक्रेत्यांचे अतिक्रमण ठरलेले असते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. पलीकडे रिक्षा तळ असला तरी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहिल्याने राजवाडा परिसरात वाहतुकीचा सावळा गोंधळ आहे. त्यात शहर बस स्थानकाच्या अंर्तगत रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण सुरू असल्याने बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीच्या गोंधळात भर पडली आहे.