नगर – गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मास्टरमाईंड ठरलेले, तसेच मी पुन्हा येईल…असे जाहीर करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा परत आले; पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर उपमुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. दुपारपर्यंत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा असताना अचानक उलटे समीकरण झाल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
दरम्यान, नव्याने आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील चार आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज (गुरुवार) सकाळपासून नव्याने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर आज शपथविधी होणार हे निश्चित झाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात भाजपचे नेते व कार्यकर्ते सुन्न झाले.
असा अचानक निर्णय कसा घेतला गेला, त्यामागे काय कारण आहे. केंद्रीय नेतृत्वाने असा बदल का केला. त्यात फडणवीस यांनी मंत्रिमंडळातदेखील सहभागी होणार नसल्याचे म्हटल्यामुळे कार्यकर्ते अजूनच आवाक् झाले. अर्थात शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतल्याने काहीसा दिलासा नेते व कार्यकर्त्यांना मिळाला असला, तरी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व्हावे ही नेते व कार्यकर्त्यांची इच्छा होती. अचानक फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्याने नेते व कार्यकर्त्यांचे पडलेले चेहरे सर्वकाही सांगून जात होते.
दरम्यान, शिंदेंच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आता जिल्ह्यात कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्चित आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रा. शिंदे आमदार झाल्यानंतर लगेच शिवसेनेत बंडखोरी झाली काय आणि पुन्हा सत्तांतर झाले. त्यात आमदार रोहित पवार यांना शह देण्यासाठी प्रा. शिंदे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यानंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. आ. विखे हे जुने व ज्येष्ठ नेते म्हणून, तर आ. राजळे यांना महिला म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.
अखेर सेनेचा मुख्यमंत्री : फाळके
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचे वलय व धाक आहे. त्यांच्या शिवसेनेला घाबरूनच भाजपने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिले. देवेंद्र फडणवीसदेखील सत्तेपासून दूर राहणार नाहीत. तेही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून सत्तेत सहभागी होतील. मात्र, या सत्तांतरामागे भाजप असल्याचे आता लपून राहिले नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेत फूट पाडली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केले.
फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक: बेरड
सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्र विकासात पुन्हा गतीने पुढे येण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला, तसेच अनंत दिघे यांच्या निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी देऊन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी व्यक्त केले.
आमदारांसाठी धक्काच : आ. राजळे
वरिष्ठ पातळीवरच चर्चा झाली असावी. पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आमदारांना धक्काच बसला. आज दुपारपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार अशी चर्चा असताना अचानक निर्णय बदलला गेल्याने भाजप नेते व कार्यकर्ते आवाक् झाले आहेत. अर्थात फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा दूरदृष्टीने घेतला असेल, असे मत आ. राजळे यांनी व्यक्त केले.