विकास आराखड्याला मंजुरी; केंद्र व राज्य सरकार खर्च उचलणार
पुणे – नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हिंजवडी गाव विकसित केले जाणार आहे. यासाठी सर्वांगिण सर्व समावेशक नियोजित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. यासाठी 25 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र व राज्य सरकार, जिल्हा नियोजन समिती, ग्रामनिधी, मुद्रांक शुल्क अनुदान आदी माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी हिंजवडी ग्रामपंचायतीला भेट दिली होती. त्यावेळी हिंजवडी गावात अनेक समस्या असून, त्या सुधारणे आवश्यक असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व समावेशक नियोजित विकास आराखडा तयार करुन तो तत्काळ जिल्हा परिषदेला सादर करण्याचा आदेश दिला होता.
या आदेशानुसार हिंजवडी ग्रामपंचायतीने स्थानिक लोकप्रतिनिधी, औद्योगिक वसाहतीचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजित विकास आराखडा तयार केला. या आराखड्याचे सादरीकरण जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, संदीप कोहिनकर, स्वच्छता व पाणी पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, मुळशी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप जठार यांच्यासमोर करण्यात आले.
गावात होणार ही कामे…
– घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट प्रकल्प
– सार्वजनिक शौचालये उभारणी
– अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व बांधकाम
– गावातील रस्ते व चौक सुशोभीकरण
– सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष
– प्रशासकीय इमारत,
– स्मशानभूमी, जलपुनर्भरण,
– रेन वॉटर हार्वेस्टिंग,
– क्रीडांगण व नाना-नानी पार्क, फ्री वाय-फाय सुविधा