हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2014 साली 66 टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.22 टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात हे मतदान 60 ते 65 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.अजूनही प्रशासनाकडून संपूर्ण माहिती व आकडेवारी मिळाली नाही.
संपूर्ण लोकसभा मतदारसंघात काही तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पाच वाजेपर्यत झालेल्या मतदानात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असून येथे 61.51% मतदान झाले. त्या पाठोपाठ किनवट मतदारसंघात 58.33%, वसमत मतदारसंघात 57.10%, तर उर्वरीत तीन मतदार संघात अनुक्रमे हदगाव 54.13%, उमरखेड 53.24% व सर्वात कमी हिंगोली 53.01% इतके मतदान झाले. वरील मतदानाच्या टक्केवारीत शेवटच्या वेळेपर्यंत पाच ते आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सरासरी 60 ते 65 टक्के मतदान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.