हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात खरिपात सततच्या पावसाने सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान केल्यानंतर आता मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सेनगाव तालुक्यात साखरा, हिवरखेडा, धोतरा, खडकी, यासह अनेक गावात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान झाले होते. आता सर्व आशा ही तुरीवर होती मात्र या पिकावर नवे संकट आले आहे. विविध पिकांना पावसाळ्यात जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यानंतर खरिपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पिक बहरलेले असताना त्यावर कीड व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीचे पीक उधळत आहे.
तूर उधळणे म्हणजे तुरीचे पिक बुडापासून वाळणे होय. यालाच मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणतात, असे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी सांगितले. तालुक्यात अनेक गावांत अचानक बहरात आलेली तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी दत्तराव निरगुडे यांच्या शेतातील 2 एकर मधील तूर पिक वाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तूर हे पिक विविध पिकांत आंतरपिक म्हणून घेतले जाते. शेतकरी तुरीला सिंचनाखाली आणून मोठे उत्पादन घेतात. खरिपातील अनेक पिके गेली तरी तुरीचे उत्पादन घेऊन शेतकरी आधार मिळवतात. परंतु या वर्षी हे पिक पन्नास टक्क्यांपर्यंत गेले आहे. पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून डोळ्यात पाणी उभारले आहे.
ऐन बहरातील पिकावर हे नवे संकट उभारले आहे. यावर सध्या तरी कोणता उपाय नसून पिक पद्धतीत पुढील वर्षी बदल करावा लागणार आहे. पावसाळ्यात झालेल्या जास्तीच्या पावसाने वावरात पाणी साचून ते त्यात मुरले व बुरशी वाढून आता त्याचा हा परिणाम होत असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.