हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांच्या पाठीशी संकटांची मालिका सुरूच असून पेरणीपासून सतत पाऊस असल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. पिवळ्या मोझ्याक रोगाचे प्रादुर्भाव व आणि आता लष्करी अळीचा हल्ला व शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे उत्पादन अर्धे अधिक घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पेरणीचा खर्च ही निघणार नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्या खाली पुरता डूबण्याची चिन्हे पुन्हा दिसू लागली आहेत.
सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा धोतरा बोरखेडी खडकी यासह तालुक्यातील अनेक गावामध्ये या वर्षीच्या खरीप पिके धोक्यात आले आहेत. शेतक-यांनी कापसा सह सोयाबीन बियाणाची पेरणी उरकली मात्र पेरणी झाली तेव्हा पासुन सतत संपुर्ण जुलै महिण्यात पावसाची रिपरीप सुरू राहिल्याने कापसा सह सोयाबीन पिक पिवळे पडून जमिनिशी रांगते राहिले. त्यातच वाढिच्या अवस्थेत असतांना पिवळ्या मोझ्याकने (केवडा) सोयाबीन पिकावर हल्ला चढवला. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि आत्ता सोयाबीन पिकांवर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव व पिवळा मोझ्याक नंतर आता याची कमी की काय म्हणून पुन्हा निसर्गाने लष्करी अळी नुकसानी साठी पाठवल्याचे चित्र तालुक्यातील शेतशिवारात दिसू लागले असुन सतत चे दमट हवामान,मागिल आठवडा भरापासुन पडणारा पाऊस या मुळे आता सोयाबीन पिकाची पाने खाणारी लष्करी अळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही अळी सोयाबीन पिकांची संपुर्ण पाणे खात असल्यान प्रकाश संश्लेशन क्रिया मंदावते. परिणामी सोयाबीन पिकात दाने भरण्याची क्रिया सुरू असतानाच असाप्रकार समोर आल्याने अजून उत्पादनात घट येणार हे निश्चित आहे. सततच्या पावसाने शेतात किटकनाशक फवारणी करण्या साठी ही जाता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाची बिकट अवस्था असतांनाही कृषीविभाग मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे.
“माझ्याकडे पाच एकर शेती असून मी चार एकर मध्ये सोयाबीन पेरले आहे आणि एक एकर हळद लागवड केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पूर्ण तळे साचले होते, त्यामुळे सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले व आत्ता माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाई व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. मी आत्ता पर्यन्त तिन वेळेस फवारणी केली आहे मात्र अद्यापही अळीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.
– रवि काळे ( शेतकरी,साखरा)
कापसाचे उत्पादन ही घटनार
या वर्षी उशिराने झालेला पाऊस, लागवडी नंतर महिनाभर लागून राहिल्याने सखलभाग आणि काळीशार जमिनितील कापसाच्या पिकाची वाढ खुंटली त्यामुळे कापुस पिक दिसपुरवल्या गत जमिनिशी रेंगाळत राहिले. यात पावसाच्या खंडाने मोठे नुकसान झाले असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. एकुणच आस्मानी संकटां बरोबरच कृषीविभागाच्या सुलतानी संकटाचा सामना शेतक-यांना करावा लागत असल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करताहेत. सध्या सोयाबीन पिकांवर शंखी गोगलगाईचा व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे तरी कृषी विभागाच्या वतीने तात्काळ शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करावे अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे