हिंगोली – पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गोळेगाव परिसरात घडली. कारमधून पती, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा प्रवास करत होते. यावेळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून गेली. यात महिलेचा मृत्यू झाला असून चिमुरडा बेपत्ता आहे. तर कारमधून बाहेर पडण्यात यश आल्याने पतीचा जीव वाचला. वर्षा पडोळ (38) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथून नातेवाईकांना भेटून पडोळ दाम्पत्य आपल्या मुलासह घरी निघाले होते. मात्र परत जाताना त्यांची कार गोळेगाव येथील पुलावरुन वाहून गेली.
अपघातातून पती योगेश पडोळ हे काही अंतरावर बाहेर निघाले, मात्र त्यांची पत्नी वर्षा पडोळ आणि मुलगा श्रेयन हे दोघे वाहून गेले. घटनास्थळावरुन काही अंतरावर वर्षा पडोळ यांचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला आहे, तर श्रेयन अद्यापही बेपत्ता आहे. पडोळ कुटुंबीय औंरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कायाधु नदी भरुन वाहत असल्याने नदीचे पाणी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलावरुन वाहत होते. नांदेड-हिंगोली महामार्गावरील रात्री वाहनसेवा काही वेळ ठप्प झाली होती. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात ओढ्याला पूर आल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाजीपाला विक्री करुन येणाऱ्या शेतकऱ्याची एक मॅक्स जीप वाहून गेली. त्यातील दोघे जण सुखरुप बाहेर निघाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.