हिंगोली (प्रतिनिधी) :- हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक मंडळात ढगफूटी देखिल झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असे आश्वासन देखील दिले होते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव बाभूलगाव पुसेगाव व आजेगाव हें सर्कल अतिवृष्टीतून वगळ्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये एवढा निधी अतिवृष्टी धारकांमध्ये वितरित होणार असे म्हटलं, मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभूळगाव आणि पुसेगाव ही चारगाव मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे तेथील शेतकरी निराश झालेत. अशाच एका नाराज शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिलं. वरील चार मंडळाचा समावेश करून अतिवृष्टी नुकसान भरपाई मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की,
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,
महाराष्ट्र
विषय :- आम्ही महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळल्या प्रकरणी…
सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला. सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळी नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का…?
साहेब अधिवेशनातून घोषणा केली शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग हे काय? खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले. जगायचे कसे ते सांगा. अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ. अनुदान द्या .
– नामदेव पंतगे
मु. ताकतोडा (सेनगाव ,हिंगोली)
आज हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांना रक्ताताने लिहून निवेदन देण्यात आले आहे. या सेनगाव तालुक्यातील पेरण्या झाल्या वर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे पुढारी राजकारणात गुंतलेले आहेत.
सोबतच कृषी विभागाला देखील विसर पडला आहे. सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात असतांना तुम्ही चार मंडळे अतिवृष्टीमुळे वगळ्यात आले आहेत मग आम्ही महाराष्ट्रात राहत नसून बिहार मध्ये राहतो का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.