मुंबई : हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते. त्यानंतर आता त्यांच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
“हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. नुसतं भाषणातून बोलत चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरु होते तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागते. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडलं एवढंच सांगावं,” असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केले होते ते करुन दाखवावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात आपण निदर्शन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.
“कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरु आहे हे काल उघड झाले. जे आंदोलन सुरु आहे त्याचा फायदा घेऊन कशाप्रकारे भारताला बदनाम करायचं, भारतात अराजक निर्माण करायचं यासंदर्भातील योजना बाहेर आलेली आहे. कशाप्रकारे वेगवेगळ्या देशातील नेत्यांना यामध्ये आणून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करुन भारताला कसं बदनाम करायचं हे कालच्या ट्विटमुळे उघड पडले आहेत. आता देशातील लोकांनाही आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कशा पद्दतीने आपली पोळी भाजण्याचा आणि भारतविरोधी कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झालं आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.