सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
पुणे –“गायींची कत्तल होते, ही समस्या नाही. पण, गाईला श्रद्धेने माता म्हणणारे गाईला सांभाळायला तयार नाहीत, ही खरी समस्या आहे. गाईला कत्तलखान्यात पोहोचवण्याचे काम सर्वांत जास्त हिंदू नागरिकांकडून होत आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
गो विज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने गो सेवा करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा शनिवारी भागवत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी “श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गो सेवा परिवार’ पुरस्कार कोलकत्ता येथील “गो सेवा परिवार’ यांना प्रदान करण्यात आला.
तर राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. ज्योती मुंदरगे, वैद्य अजित उदावंत यांना देण्यात आला. तर “गो सेवा युवा पुरस्कार’ पूनम राऊत यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, ज्येष्ठ लेखक मोरेश्वर जोशी यांच्या “गोविज्ञान चळवळीचे प्रवर्तक-श्रद्धेय मोरोपंत पिंगळे’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रवींद्र वंजारवाडकर, संस्थेचे राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी आदी उपस्थित होते.
“काही वर्षांपूर्वी शेतकरी गाईला व्यापाराच्या उद्देशाशिवाय सांभाळत होते. गोबर, गोमूत्रामुळे शेती संपन्न होत होती. कोणत्याही खतांसाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागत नव्हता. त्यामुळेच पूर्वीचे अन्न विषमुक्त होते. पण सध्याचे अन्न मात्र विषयुक्त झाले आहे,’ अशी खंत भागवत यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया अत्रे यांनी केले. बापू कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.