गुवाहाटी – हिंदुंनीही त्यांच्या मुलांची लग्ने लवकर करण्याचा मुस्लिम समुदायाचा फॉर्म्युला वापरावा असा सल्ला आसाममधील राजकीय नेते आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष बदरूद्दीन अजमल यांनी दिला आहे.
मुस्लिम मुलांचा विवाह 20-22 व्या वर्षी केला जातो आणि मुस्लिम मुलीही सरकारने परवानगी दिलेल्या वयात म्हणजे 18 व्या वर्षांनंतर लग्न करतात. याललट हिंदू मुलांच्या लग्नाच्या अगोदर दोन तीन बेकायदा बायका असतात. त्या मुलांना जन्म देत नाहीत, मौजमजा करतात आणि पैसे वाचवतात. नंतर पालकांच्या दबावामुळे ते चाळीस वर्षाचे झाल्यानंतर लग्न करतात.
चाळीशीनंतर मूल होण्याची अपेक्षा ते कशी करू शकतात? त्यामुळे त्यांनीही मुस्लिमांचाच फॉर्म्युला वापरला पाहिजे आणि मुलांनी वीशीत तर मुलींनी 18 वर्षांचे असतानाच लग्न केले पाहिजे. मग बघा त्यांनाही कशी मुले होतील असा अजब सल्ला अजमल यांनी दिला.
सध्या देशभर चर्चेत असलेल्या श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी लव्ह जिहादबाबत एक विधान केले आहे. त्याबाबत अजमल यांना विचारल्यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री देशातील बडे नेते आहेत.
त्यामुळे त्यांना कोण रोखू शकते. तुम्हीही चार पाच लव्ह जिहाद करा आणि आमच्या मुस्लिम मुलींना न्या. आम्ही भांडणार नाही, तुमचे स्वागतच करू आणि यामुळे तुमच्यात किती ताकद आहे तेही दिसून येईल.