राजुरीत हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र
अणे – राजुरी (ता. जुन्नर) या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे. ती जपण्याचा, जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबीयांमार्फत दरवर्षी केला जातो.
फराळातून प्रेम वृद्धिंगत होवो, असे मत मुस्लिम सदर झाकीर पटेल यांनी व्यक्त करत हा कार्यक्रम म्हणजे विचारांचा फराळ, विचारांची देवाणघेवाण असून मनामनातील सात्विक वृत्तीचे दर्शन घडवणारी हिंदू मुस्लिमांची आगळीवेगळी बैठक आहे. सुसूत्रता, चांगल्या प्रकारची विचारधारा असलेली लोकं एकत्र येऊन समाज बांधणी, उभारणीसाठी सक्षमपणे प्रयत्न करतात. अतिशय सज्जन, निर्मळ मोठ्या मनाचं हे शेळके कुटुंब शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर घालत असतानाच सामाजिक एकोपा, समता, बंधुता, सलोखा आणि विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम समाजाला प्रेरित करणारे आहे. माणुसकी आणि मानवता हीच आपली जात आणि धर्म आहे. राजुरी गाव सर्वच क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, मग जात, धर्म, पंथ, पक्ष याचा विचार न करता फक्त माणुसकी म्हणजे सर्व काही असा विचार करून मार्गक्रमण करावे आणि प्रगती साधावी असे झाकीर पटेल म्हणाले.
वल्लभ शेळके यांसारखा नेतृत्वाचा ठसा उमटवणारा, लोकव्यवस्थेचा ध्यास असणारा एक व्यक्ती सत्ता नसतानाही बुद्धिमत्तेच्या जोरावर व जनतेच्या पाठिंब्यावर वेगवेगळे समाजाभिमुख कामाची आखणी करताना आम्हाला देखील सहकार्य करतो, असे रईस चौगुले म्हणाले.
जुन्या आठवणींना उजाळा देत चालीरीती, परंपरा, संस्कृती यांचे जतन करण्यासाठीच हा कार्यक्रम घेत असल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले. पांढरी पासून ते वावळापर्यंत ते तागडा पासून गोगडापर्यंत सर्वांशी स्नेहाचे आपुलकीचे आणि घरोब्याचे संबंध. आत्या आणि मामु म्हणजेच आमच्या कुटुंबातील एक जिव्हाळ्याची, जवळची व्यक्ती. राजुरी गावचा मुस्लिम हा कर्तबगार मुस्लिम समाज म्हणून ओळखला जातो. इकबाल भाईंचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची शेरोशायरी मनाला भावणारी होती.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मनिरपेक्षता वृद्धिंगत होईल. तुम्ही आणि आम्ही एक आहोत. अंधारकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी हे सण येतात असे मत माऊली शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी वसंत शेळके, विवेक शेळके, डी. बी. गटकळ, दत्तात्रय हाडवळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिंदे गुरुजी, दत्ता फावडे, राजू कणसे, जी. के. औटी सर, लहु गुंजाळ, काशीनाथ औटी, रमेश औटी, प्रवीण ससाणे, अनिल रायकर, संजू पिंगळे, अकबर पठाण, शाकिर पटेल, कलीम पटेल, पप्पू पटेल, अजुभाई पटेल, बशीर पठाण, बाबा पठाण, बाबू पठाण, अशोक हाडवळे, अब्दुल गणी पटेल, सुलतान जमादार, मुस्लिम जमातीचे शौकत चौगुले, अबू बक्कर चौगुले, नजीर शेख, सलीम पटेल, पप्पू पटेल, अस्लम भाई व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.