नवी दिल्ली – हिंदीचा कोणत्याही स्थानिक भाषेशी मतभेद नाही, हिंदी भाषा ही भारतातल्या सर्व भाषांची सखी असून सहयोगानेच पुढे जाऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केले. हिंदी दिवस 2021निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
आपण संविधानाचा स्वीकार केला त्याबरोबरच 14 सप्टेंबर 1949 ला या देशाची राजभाषा हिंदी राहील आणि लिपी देवनागरी राहील या निर्णयाचा स्वीकार केल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावेळी सांगितले. हे पुरस्कार अनेकांना प्रेरणा देतात आणि राजभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्साहदायी ठरतात. बिगर हिंदी पुरस्कार विजेत्यांचे विशेष अभिनंदन करत आपण ज्या प्रदेशातून येता त्या प्रदेशातल्या भाषेबरोबरच राजभाषाही त्या प्रदेशात पोहोचवण्याचे आपण उत्तम काम केल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
14 सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी, आपण आपल्या देशाच्या भाषा आणि राजभाषा यासाठी काय केले, त्यांच्या संवर्धनासाठी काय केले, विशेषकरून नव्या पिढीमध्ये, त्यांच्या रोजच्या वापरामध्ये आपल्या स्थानिक भाषांना मानाचे स्थान देण्यासाठी काय केले, याचे मूल्यमापन करण्याचा दिवस आहे.
आत्मनिर्भर ही संज्ञा फक्त उत्पादन वा व्यापारी क्षेत्राला लागू नाही तर आत्मनिर्भर असणे भाषेच्या बाबतीतही लागू आहे आणि तेव्हाच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. भाषांच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर बनलो नाही तर आत्मनिर्भर भारत हे म्हणणे निरर्थक आहे असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यचळवळीदरम्यान महात्मा गांधीच नाही तर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, के एम मुन्शी अश्या अनेक नेत्यांनी स्वभाषेच्या वापरावर भर दिला. विनोबा भावेंना तर भारतीय भाषांची बाजू मजबूत करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. महात्मा गांधींनी तर राजभाषेला राष्ट्रीयत्वाशी जोडले होते. यावरून आपल्याला हिंदी मजबूत करण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे.
आपला देश अनेक विविधतांनी नटलेला आहे. अनेक प्रदेश, केंद्रशासित प्रदेशांचा आपापला गौरवास्पद इतिहास आहे आणि तो वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये आहे. देशातील प्रत्येक भागाचा त्या त्या स्थानिक भाषांमध्ये असलेल्या इतिहासाचा अनुवाद तसेच भावानुवाद राजभाषेत झाला पाहिजे, जेणेकरून एकच भाग नाही तर संपूर्ण देश हा इतिहास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.यावेळी शहा यांनी राजभाषा हिंदीमध्ये उत्कृष्ट काम करणारी मंत्रालये, विभाग आणि उपक्रमांना राजभाषा कीर्ती आणि राजभाषा गौरव पुरस्कार प्रदान केले.