नवी दिल्ली – नवोदित अव्वल धावपटू हिमा दास, द्युती चंद, एस. धनलक्ष्मी आणि अर्चना सुशींद्रन यांना टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश आले आहे. या खेळाडूंचा समावेश असलेल्या महिला रिले संघाने इंडियन ग्रांप्री स्पर्धेत 43.37 सेकंद अशी वेळ देत स्पर्धा विक्रमही साकार केला. मात्र, ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात त्यांना अपयश आले.
भारताच्या ब संघाने 48.02 सेकंद वेळ नोंदवली. द्युतीने 100 मीटर शर्यत 11.17 सेकंद वेळेत जिंकली. मात्र, तिची ऑलिम्पिक पात्रतेची संधी (11.15 सेकंद) हुकली.
भारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग हा राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. याचप्रमाणे 4 बाय 100 मीटर रिलेमधील भारताच्या अ महिला संघाने आणि द्युती चंदने राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली.
ताजिंदरने 21.49 मीटर अंतर गोळा फेकून पार केले व ऑलिम्पिक पात्रतेचे 21.10 मीटर अंतराचा निकष पूर्ण केले. त्याने 2019 सालातील आपलाच 20.92 मीटरचा विक्रम मोडला.