पोलिसांकडून नाराजी; सोसायटीचे पदाधिकारीही वैतागले
सहकारनगर – झोपडपट्टी भागात करोनाचा शिरकाव झालेला असताना उच्चशिक्षित नागरिक कायदेशीर पळवाट काढून घराबाहेर पडत आहेत. जे लोक नियम पाळत आहेत त्यांच्या जीवाला अशा लोकांकडून धोका संभवतो, असे लोक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहे.
झोपडपट्टीतील लोक नियम पाळत नाहीत. परंतु, त्यांना सांगितले की, ते गप्प बसतात. परंतु, उच्चशिक्षीत लोकांना काही सांगायचे म्हंटले की, ते कायदे शिकवतात. वाद घालतात त्यामुळे अडाणी लोक परवडले, असे पोलीस सांगत आहेत.
करोना आजाराने जगात हाहाकार माजविला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने यावर सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नियम पाळण्याचे आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह शासकीय यंत्रणा करीत आहेत. परंतु, जिवनावश्यक सेवा सुरू असल्याने भाजीपाला, दवाखाना, मेडिकल, दूध यासह अन्य कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पद्मावती येथील शेकडो सदनिका असलेल्या सोसायटींमध्ये पाहणी केली असता दूध, भाजीपाला, किराणा या सुविधा घरपोच केलेल्या असताना सोसायटीतील अनेक नागरिक जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असल्याचे सोसायटीच्या गेटवर असलेल्या नोंद वहीतील नोंदीवरून दिसून आले. विशेष म्हणजे काही सदनिकाधारक फेरफटका मारण्यासाठी, पाळीव प्राण्यांना फिरविण्यासाठी बाहेर पडत आहेत. काही शासकीय सेवेतील माजी अधिकारी सुद्धा कोणतेही सरकारी नियम व शिस्त पाळत नसल्याचे दिसत आहे. सोसायटी सभासदांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनाश्यक वस्तू सोसायटी मध्येच सोसायटी पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, अनेक जण बाहेर पडण्याकरिता वेगवेगळी कारणे शोधत आहेत.