पिंपरी – सरकारकडून एकीकडे साक्षर भारत, सर्व शिक्षा, डिजिटल इंडिया अशा योजना राबविल्या जात आहेत. परंतु दुसरीकडे मात्र याच योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधित्व करण्याची इच्छा मनात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांची शैक्षणिक स्थिती अगदीच विपरीत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात आजही अनेक अशिक्षित आणि अल्पशिक्षित उमेदवार आपले भवितव्य आजमावित असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघामध्ये आखाड्यात उतरलेल्या 41 उमेदवारांपैकी 53 टक्के उमेदवार दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. तर बारावी ते पदव्युत्तर 46.33 टक्के उमेदवार निवडणूक लढत आहेत.
मागील काही वर्षांपासून राज्यकर्त्यांनी सर्व शिक्षा अभियानापासून ते “डिजिटल इंडिया’ पर्यंत वेगवेगळ्या संकल्पना राबवून देश आणि राज्यात साक्षरता वाढीसाठी प्रयत्न केले. याला यशही आले. मात्र, आजही राजकीय आखाड्यात नशीब आजमावण्यासाठी अशिक्षितापासून ते अल्पशिक्षित उमेदवारांचीच मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगत शहरात अल्पशिक्षित उमेदवारच मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवत असल्याचे उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
शहरातील तिन्ही मतदारसंघातून 2.43 टक्के उमेदवार अशिक्षित आहेत. पहिली ते चौथी या प्राथमिक वर्गामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा सहभाग 4.87 टक्के आहे. पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या 8 आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी दहावी व पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार सर्वाधिक आहे. दहावी शिक्षण घेतलेले 11 उमेदवार असून 26.82 टक्के त्यांचा सहभाग आहे. तर बारावी शिक्षण घेतलेले सहा उमेदवार आहेत. शहरातून नऊ उमेदवार पदवीधर असून त्यांचा 21.95 टक्के सहभाग आहेत. यासोबतच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार राजकारणाकडे येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शहारातून केवळ 4 उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांची एकूण टक्केवारी 9.75 आहे. एकीकडे प्रमुख उमेदवारांमध्ये अनेक उच्चशिक्षितांचा भरणा असला तरी दहावीपर्यंत शिक्षण घेतेलेल्या उमेदवारांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यातही अनेकांनी दहावीपर्यंतही मजल मारलेली नाही. तिसरी, सातवी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.