मुंबई – देशातील विद्यापीठांसह महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासंदर्भात युजीसीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दिवाळीनंतर करोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, कुलगुरूंच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च शिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत म्हणाले, युजीसीने गाईडलाइन्स जारी केल्या असून त्यात राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे सुचविले आहे. या गाईडलाइन्सबाबत कुलगुरूंसोबत चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या कुलगुरूंची बैठक दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे.
यामुळे महाविद्यालय कधी सुरू करायचे याबाबत आताच निश्चितपणे सांगू शकत नाही. ऑनलाइन वर्ग घेऊन जर कॉलेज सुरू करता येतील का याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच 13 विद्यापीठांचा अपवाद वगळता सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची गाजलेली परीक्षा सुद्धा पार पडली आहे. या परीक्षेदरम्यान एकही विद्यार्थी करोनाबधित झालेला नाही. तसेच मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रामध्ये कुठेही बदल होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.