नगर -जिल्ह्यात आणखी 6 करोनाबाधित आढळून आल्यानंतर जिल्ह्यात हाय अलर्ट करण्यात आला असून नगर शहरासह जामखेड, संगमनेरमध्ये पोलीस बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक आदेश कडक करण्यात आले आहेत.
या व्यक्तीसोबत असणाऱ्या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे. स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सुमारे 3 हजार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात 200 पोलीस अधिकारी यांनी दिवसभर स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होती. गस्तीचा आढावा जिल्हा नियंत्रण शाखेला दर तासाला देण्यात येत होता. बंदोबस्तासाठी 17 शीघ्रकृती दल, 4 आरसीपीची तुकडी, महिलांची पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, गोपनीय पथक, मोबाईल सेल पथक, बिनतारी विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहेत. तसेच आज पुन्हा एसआरपीच्या 3 तीन तुकड्या दाखल झाल्या असून नगर शहरात एक, संगमनेर मध्ये एक पाठविण्यात आल्या आहेत. नगर शहरात बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात 12 पथके तैनात करण्यात आली असून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
संगमनेरात तीन दिवस कर्फ्यू
संगमनेर तालुक्यात पुढील तीन दिवस कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवस कोणीही घराच्या बाहेर आढळून आल्यास त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188, तसेच साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांनी दिला आहे.