हिंगोली : आधीच यंदा ओल्या दुष्काळाने शेतकरी उध्वस्त झालेला असताना हाता तोंडाशी आलेला घास खरीप हंगामात हिरावून नेला. त्यात आता शेतकरी रब्बीसाठी सक्रिय असताना महावितरणाकडून शेतकऱ्याची थट्टा चालवली जात आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा गावात विजेच्या प्रश्नावरून वीज वितरण विभाग व गावकऱ्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट टावरवर चढून आंदोलन केले.
वीज बिल भरा अन्यथा …वीज पुरवठा मिळणार नाही अशी आक्रमक भूमिका महावितरणाने घेतली आहे. त्यामुळे महावितरणाविरोधात हिंगोलीत तीव्र आंदोलन केलं जात आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको, तर कुठे जलसमाधी आंदोलन केलं जात आहे. आज मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील सुरज खेडा येथील गावकऱ्यांनी प्रशासनाला चांगलाच घाम फोडला आहे. सुरज खेडा गावातील गावकरी विजेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले असून वीज सुरळीत सुरू करण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी हाय व्होल्टेज टॉवरवर चढून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला आहे.
गावकरी अचानक पोलवर चढल्यामुळे प्रशासन चांगलंच हादरलं आहे. शेतकऱ्यांना दिवसा सुरळित वीज पुरवठा करण्यात यावा, लोडशेडिंग कमी करावं अशा विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याचबरोबर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारे विद्युत रोहित्र निकृष्ट दर्जाचं देण्यात येत असल्यामुळे, यात वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार विद्युत रोहित्र पुरवण्यात यावं, सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवावा अशा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सूरजखेडा येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या टॉवर वर जाऊन अनोखे आंदोलन केले आहे. वीजेची समस्या दूर करण्यासाठी वारंवार निवेदन देवून सुद्धा प्रशासन आणि एम.एस.सी.बी यांनी कोणत्याच प्रकारचे निराकरण न करता गेल्या आठवडा पासून सुरु असलेल्या वीजेच्या समस्यांच्या मुळाशी न जाता हलगर्जी पणा आणि नाकर्तेपणा दाखवून दिला. सूरज खेडा गाव शेजारी असलेल्या गावांना 16 तास वीजपुरवठा आहे आणि सूरजखेडा गावाला हलक्या प्रतीची वागणूक मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी हें अनोखे आंदोलन केले आहे. सध्या कडॊली येथून वीज मिळत आहे. पण जास्त लोड मुळे सूरजखेडा गावचा वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वारंवार निवेदन देवून सुध्दा काहीच मार्ग निघाला नाही.
मुख्य अभियंता देशमुख मॅडम यांनी येऊन लेखी स्वरूपात निवेदन देवून आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलनापासून मागे हटणार नाही असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी गोरेगांव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.