भाव तेजीत : साखरेच्या भावातही थोडीशी वाढ
पुणे – संक्रांतीमुळे भुसार बाजारात गुळाला जास्त मागणी आहे. त्यामुळे गुळाचे भाव तेजीत असून, साखरेच्या भावातही थोडीशी वाढ झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या आयातीवर निर्बंध लादल्याने 15 किलोच्या डब्यामागे 20 रुपयांची वाढ झाली. उडीद डाळीऐवजी मूग डाळीवर आता सट्टा बाजाराचा परिणाम होऊ लागल्याने त्याच्या दरातही वाढ झाली. अन्य वस्तूंचे दर स्थिर आहेत.
मार्केट यार्डातील घाऊक भुसार विभागात या आठवड्यात आवक जावक सुरू राहिल्याने त्याच्यावर परिणाम झाला. मात्र, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, रवा, आटा, मैदा, बेसन, शेंगदाणे, साबुदाणा, भगर, हळद आदी वस्तूंचे दर स्थिर राहिले आहेत.
संक्रातीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गुळाची सध्या मार्केट यार्डात घाऊक भुसार विभागात चांगली आवक होत असून मागणीही चांगली होत आहे. त्यामुळे चिक्की गूळ तेजीत राहिला आहे. सध्या लाल मिरचीचे दरही तेजीत आहेत. सध्या आवक कमी होत आहे. सुरुवातीचे पीक हे पावसामुळे खराब झाले. संक्रातीनंतर आता नवे दुसरे पीक येणार आहे.
खाद्यतेलावर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम झाला. सरकारने रिफाईंड पामतेलाच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या 15 किलोच्या दरात 20 रुपयांची वाढ झाली आहे. खोबरेल तेलाच्या दरात कोणतीही दरवाढ किंवा घट नाही.
साखरेला संक्रांतीमुळे मागणी वाढली आहे. क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंत उडीद डाळीचा सट्टा बाजारावर परिणाम झाला होता. आता मूगडाळीवर होत आहे. त्यामुळे मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ झाली. तर हरभरा डाळ, तूरडाळ, उडीदडाळीच्या दरात 100 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे.
वस्तूंचे दर
शेंगदाणा तेल 1900 ते 1950, सरकी 1350 ते 1560, सूर्यफूल 1420 ते 1500, सोयाबीन 1460 ते 1560, पामतेल 1450 ते 1520, खोबरेल तेल 2350, साखर (क्विंटलमध्ये) 3400 ते 3450, मूगडाळ 9500 ते 10000, हरभरा डाळ 5300 ते 5600, तूरडाळ 7000 ते 8500, उडीदडाळ 7500 ते 9500, मटकी डाळ 8500 ते 9000.