अपघात झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्या
मुंबई: दुरुस्तीच्या कामावेळी झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या इलेक्ट्रीशियनला नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. अपंग झालेली व्यक्ती कंपनीची कर्मचारी नसली तरी त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बोलावले होते. त्यामुळे कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करत इलेक्ट्रीशियन सदाशिव कटके यांना चार आठवड्यात नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश महावितरण कंपनीला दिले.
इलेक्ट्रीशियन म्हणून काम करणाऱ्या सदाशिव कटके यांना 2018 साली 11 किलो वॅटच्या इलेक्ट्रिक पोलवरील दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या टेक्निशियन आणि ऑपरेटरने बोलावले. कटके पोलवर चढण्याआधी त्यांनी विद्युत प्रवाह बंद करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. महावितरण कर्मचाऱ्याला विद्यूत प्रवाह बंद करण्यास सांगितले असल्याची कल्पना कटके यांना दिली. मात्र प्रत्यक्षात वीज प्रवाह बंद करण्यात आला नसल्याने कटके शॉक लागल्याने पोलवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले.
अपघातात जखमी झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यास भरपाई दिली जाते. परंतू कटके हे महावितरणचे कर्मचारी नसल्याने महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्या विरोधात कटके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.