मालमालमत्ता जप्त करण्याच्या बॅंकेच्या नोटिसीला स्थगिती
मुंबई : कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या थकीत कर्जमुळे मेटाकूटिला आलेल्या हॉटेल महाराजाचे मालक सुनील खोत यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कर्ज वसुलीसाठी बॅंकेने बजावलेल्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसीला न्यायालयाने स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मालमत्तेतील 5 गाळे विकण्यास जर परवानगी दिली असेल तर मालमत्ता जप्त करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले.
कर्ज वसुलीसाठी कोल्हापूर अर्बन बॅंकेने महाराजा हॉटेलची पूर्ण जागा जप्त करण्याची खोत यांना 20 फेब्रुवारीला नोटीस बजावली होती. त्या विरोधात हॉटेल मालक खोत यांच्यावतीने ऍड. संदिप कोरेगावे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी ऍड. संदीप कारेगावे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खोत यांनी पाच गाळ्यांची विक्री करण्यास बॅंकेला संमती दिली आहे. असे असताना बॅंकेने संपूर्ण हॉटेल जप्त करण्याची बजावलेली नोटीस ही बेकाययदा आहे, असा दावा केला.
खोत यांनी घेतलेले कर्जाची परत फेडकरण्यासाठी यापूर्वी 4 गाळ्यांची आणि आता 5 गाळ्यांची संमती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण हॉटेलच जप्त करण्याची आवश्यक नाही. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेत न्यायालयाने बॅंकेच्या नोटीसीला स्थगिती दिली.