मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुभाव झपाट्याने वाढत बसताना दक्षता म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद, गोवा खंडपीठाचे नियमित कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणीचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या वतीने रजिस्टर जनरल एस. बी. अगरवाल यांनी आदेश काढले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी, चार ते पाच हजार वकिलवर्ग आणि पक्षकार असे सुमारे 10 हजार जण कोर्टात दररोज विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी येत असतात. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने हा आजार बळावू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना, केंद्र तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.
याचिकाकर्ते, वकिल, स्टाफ मेंबर्स आणि पक्षकार यांच्या सुरक्षेकरीता प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्यावतीने रजिस्टार जनरल एस बी अग्रवाल यांच्यामार्फत नोटीफिकेशन जारी केले आहे.त्यानुसार 16 मार्चपासून आठवडाभरासाठी केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जाणार असून गरज असल्यास तातडीच्या प्रकरणासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयात प्रकरणे सादर करावीत. तसेच प्रलंबित खटल्यांच्या पुढील सुनावणीची तारीख ही पक्षकारांना ऑनलाईन पाहता येईल, असेही या नोटीफिकेशनमध्ये नमूद केले आहे.