पुणे – विमा कंपनीची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला उच्च न्यायालयाने लग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.
शिवम राजेश तिवारी (वय २८) असे जामीन देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तिवारीसह मनोज कुमार रुपकुमार जैन (वय ३८) आणि मोहित सिंह राजेंद्र सिंह (वय २९, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर येथील सायबर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. मार्च २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात तिवारी याला दोन डिसेंबर २०२४ ला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली होती.
तिवारी याने जामीन मिळण्यासाठी ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बँक खाते उघडणे अर्जदार आरोपीच्या कामाचाच भाग आहे. १६ जानेवारी २०२५ ला त्याचे लग्न असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच जमले होते लग्न –
जामिनाच्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीचे लग्न हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी ठरले होते की, गुन्हा दाखल झाल्यानंतर? असा प्रश्न विचारला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी लग्न ठरले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने आरोपीला लग्नासाठी दोन आठवड्यांचा मंजूर करून २८ जानेवारीला हजर होण्याचा आदेश दिला. जामीन अर्जावर पुढील सुनावणी ३१ जानेवारीला होणार आहे.
अशी केली फसवणूक –
बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला आहे, मात्र त्याची मुदत संपून देखील क्लेम न केलेल्या अनिवासी भारतीय विमाधारकांची माहिती कंपनीतील कर्मचारी मनोज जैन याने कोणताही अधिकार नसताना जमा केली. या विम्याची माहिती इतर आरोपींना देत क्लेम मंजूर करून घेत त्याची रक्कम तिवारीने तयार केलेल्या बनावट बँक खात्यात जमा केले. विम्याचे पैसे विविध बँक खात्यांवर स्वीकारून कंपनीची एकूण एक कोटी ४७ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक आरोपींनी केली. तिवारी हा बँक ऑफ इंडियात खाते उघडण्याचे काम करतो.