पुणे -हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वेगाने वारे वाहतील.
राज्याच्या किनारी भागात मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) दलाच्या पाच तुकड्या पुण्यातून रवाना झाल्या आहेत. या तुकड्यांना किनारावर्ती भागात तैनात करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील किनारावर्ती भागात अतिसतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. मच्छीमारांनी या काळात समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याच्यावतीने यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस मच्छीमारी बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.