निर्वासितांचं दुःख मांडणारी नि दमनाचा कठोर प्रतिकार करणारी लेखिका म्हणजे हर्टा म्यूलर. काव्याच्या एकाग्रतेनं नि गद्याच्या मुक्तहस्तानं निर्वासितांच्या जगण्याचं चित्रण करणारी लेखिका, अशा शब्दांत स्वीडिश अकादमीनं त्यांचा गौरव केलाय…
हर्टा म्यूलर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1953 या दिवशी रोमानियात शेतकरी कुटुंबात झाला. तिथं ऐंशीच्या दशकापर्यंत जर्मन भाषा प्रचलित होती. रोमानियातल्या जर्मन अल्पसंख्याकांपैकी बनात या समुदायातलं हर्टा यांचं कुटुंब. आजोबा श्रीमंत व्यापारी. पण कम्युनिस्ट राजवटीत त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली.
हर्टा यांचे वडील दुसऱ्या विश्वयुद्धात सक्रिय होते आणि युद्धानंतर कम्युनिस्ट राजवटीत त्यांना ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करून उपजीविका चालवावी लागली. 1945 मध्ये हर्टा यांच्या आईला वयाच्या सतराव्या वर्षी सोव्हिएत युनियनने सक्तीच्या लेबर कॅम्पमध्ये दाखल केलं. 1950 मध्ये त्यांची तिथून सुटका झाली.
निकोलस लेनाऊ हायस्कूलमधून शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर हर्टा यांनी वेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ तिमिसोरा इथं जर्मन स्टडीज आणि रोमानियन साहित्य या विषयांचा अभ्यास केला. 1976 मध्ये हर्टा यांनी एका इंजिनिअरिंग फॅक्टरीसाठी अनुवादक म्हणून काम सुरू केलं. पण कम्युनिस्टांच्या सिक्रेट पोलीस संघटनेचे नियम पाळायला नकार दिल्यानं त्यांची नोकरी गेली. नोकरी गेल्यावर काही काळ त्यांनी बालवाडी शिक्षक म्हणून नि जर्मन भाषेच्या खासगी शिकवण्यांचं काम केलं.
हर्टा यांचं पहिलं पुस्तक “नादिर्स’ 1982 मध्ये रोमानियात जर्मन भाषेत प्रकाशित झालं. त्याला “सेंट्रल कमिटी ऑफ द युनियन ऑफ कम्युनिस्ट युथ’तर्फे पुरस्कारानं गौरवण्यातही आलं. जर्मन संस्कृतीत वाढलेल्या बनात समुदायावर एका बालकानं टाकलेला दृष्टिक्षेप, या पुस्तकातून मांडलाय. त्यावेळी आपल्याच संस्कृतीचं अभद्र चित्रण केल्याचा आरोपही त्यांच्यावर समुदायातल्या लोकांनी केला.
हर्टा रोमानियातल्या जर्मन भाषिक लेखकांच्या गटाच्या सदस्य होत्या. या गटानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत हर्टा यांची पाठराखण केली. तत्कालीन सरकारनं लेखकांवर अनेक बंधनं लादली होती. त्याच्या विरोधात या लेखकांचा हा लढा होता.
मोकळेपणानं नि सत्याच्या बाजूनं लिहिणाऱ्या लेखकांच्या वाट्याला अशा गोष्टी येतातच. पण हर्टा यांनी नेहमी आपली भूमिका नेटानं मांडली. त्यांना अनेक वर्षे पश्चिम जर्मनीत स्थलांतर करण्याची परवानगीही नाकारण्यात आली. अखेर तशी परवानगी मिळाल्यावर त्या पश्चिम बर्लिनमध्ये स्थलांतरित झाल्या नि अखेरपर्यंत तिथंच राहिल्या. बर्लिनला गेल्यावर त्यांनी जर्मनीत आणि परदेशातल्या विद्यापीठांमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केलं. काही मानद पदंही भूषवली.
होरिया-रोमन पतापिव्हिसी हे रोमानियन कल्चर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते. त्यावेळी 2008 मध्ये हर्टा यांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं. कम्युनिस्ट सिक्रेट पोलीस संघटनेचे हस्तक असलेल्या दोघांना या इन्स्टिट्यूटनं आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला होता. दमनकारी संघटनेचे सदस्य असलेल्या या लोकांचं अशाप्रकारचं समर्थन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी किंवा दमनकारी व्यवस्थेचा पुरस्कार, अशी ठाम भूमिका हर्टा यांनी या पत्रात घेतली होती.
“द पासपोर्ट’ ही हर्टा यांची कादंबरी 1986 मध्ये प्रकाशित झाली. पण त्यांना जागतिक ओळख मिळाली ती 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “द हंगर एंजेल’ या कादंबरीनं. या कादंबरीला जर्मन पुस्तक पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनच्या दमनकारी व्यवस्थेत जबरदस्तीनं गेलेल्या तरुण माणसाची ही कथा आहे. कवी ऑस्कर पस्तिओर यांना आलेल्या अनुभवांच्या काही नोंदी हर्टा यांनी केल्या होत्या. तसंच त्यांच्या आईचे सोव्हिएत युनियनमधले दमनकारी अनुभवही गाठीशी होते. या दोन्हीच्या साह्यानं ही कादंबरी हर्टा यांनी जिवंत केलीय.
बनात समुदायाच्या लेखक समूहानं हर्टा यांचं मनोबल वाढवलं. त्यांच्या पाठिंब्यामुळंच त्या नीडरपणे, सडेतोड लिखाण करू शकल्या. त्यांच्या पुस्तकांची कथानकं काल्पनिक असली तरी खरीखुरी माणसं नि त्यांचे खरेखुरे अनुभव याच्या पायावर ती बेतली आहेत. ”
द लॅंड ऑफ ग्रीन प्लम्स’ ही त्यांची 1996 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी त्यांनी दोन मित्रांच्या मृत्यूनंतर लिहिली आहे. या दोन मित्रांच्या गूढ मृत्यूमागं कम्युनिस्ट सिक्रेट पोलीस संघटनेचा हात असल्याचा हर्टा यांना दाट संशय होता. त्यामुळे या कादंबरीचं कथानक त्याच अंगाने पुढे जातं.अनेक पुरस्कारांवर हर्टा यांच्या नावाची मोहोर उमटली आहे.
क्लेइस्ट पारितोषिक (1994), आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार (1998) आणि फ्रान्झ वेरफेल ह्यूमन राईट्स अवार्ड (2009) हे काही निवडक पुरस्कार. 2009 मध्येच हर्टा यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं. तो दिवस सोव्हिएत युनियनमध्ये कम्युनिस्ट पतनाचा विसावा स्मृतिदिन होता हे विशेष.
शांततेसाठी नोबेल पारितोषिकानं गौरवलेल्या लिऊ जियाबो यांना दमनकारी सरकारनं विनाकारण तुरुंगात टाकलं होतं. यांच्या पत्नी लिऊ जिया यांच्या कवितासंग्रहाला हर्टा यांनी प्रस्तावना लिहिली. त्यांच्या काही कविता हर्टा यांनी अनुवादित केल्या आणि त्यांचं कार्यक्रमांतून वाचनही केलं.
अगदी कोवळ्या वयात आईला भोगाव्या लागलेल्या यातनांची सल हर्टा यांच्या हृदयात खोलवर रुतून बसली होती. ऐन उमेदीच्या काळात जाचक नियमांमुळं नोकरी गमवावी लागल्यानं ही सल आणखी खोल रुतली. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतं. कम्युनिस्टांकडून होणारं दमन, त्याचा साहित्य, समाज, राजकारण, संस्कृती यावर होणारा परिणाम आणि त्याला संवेदनशील मानवी मनानं दिलेली प्रतिक्रिया यांचं बारकाईने केलेलं चित्रण हे हर्टा यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य.
या चित्रणाला प्रसंगी कल्पनेची जोड असली तरी ते अत्यंत परखड, सडेतोड नि सचोटीनं लिहिल्यामुळं मनाला भिडतं. त्यातली वेदना, दुःख, दमन वाचकाला आतून गदागद हलवून टाकतं. या सगळ्याची बीजं हर्टा यांच्या आईच्या नि त्यांच्या स्वतःच्या वाट्याला आलेल्या दमनकारी अनुभवांमध्ये शोधता येतात. आपलं दुःख केवळ आपल्यापुरतं, समुदायापुरतं सीमित न ठेवता त्याला वैश्विकतेचं आभाळ हर्टा देतात. तेच तर त्यांच्या साहित्याचं विशेष आहे.
-डॉ. भालचंद्र सुपेकर